आवाहन

Saturday, July 20, 2013

।।तस्मै श्री गुरुवे नमः।।

                               ।।तस्मै श्री गुरुवे नमः।।


        बदलत्या काळानुसार ''कालाय तस्मै नमः'' म्हणण्याची सर्वांवर पाळी येते ही वस्तुस्थिती आहे.परंतु 

प्रत्येक वस्तूत एक असा गुणधर्म असतो जो हजारो वर्षापुर्वीही त्याच स्वरुपात असतो,त्यात बदल होत 

नाही.आपण त्यास 'मुलभूत गुणधर्म' ही संज्ञा देउ.

         'गुरु' ही संज्ञा सुध्दा त्याला अपवाद नाही.काळानुरुप या संज्ञेकडे बघण्याच्या दृष्टीकोनाला हजारो 

आयाम प्राप्त झाले आहेत.आजच्या विज्ञानयुगात मास्तर,गुरुजी ते सर,टीचर,प्रोफेसर,Insrtuctor 

आदि पर्यायी शब्द गुरु या संज्ञेला योजले जातात.यातील प्रत्येक शब्द दोन दोन वेळा म्हटला तरी 

प्रत्येक शब्दाचे वजन कसे वेगळे आहे,प्रत्येक शब्दाचा अर्थ किती उथळ किती खोल आहे हे लक्षात 

येते.परंतू या सगळ्यात एक असा गुणधर्म आहे जो हजारो वर्षापुर्वीही त्याच स्वरुपात होता आणि 

आजही अगदी तसाच आहे.तो मुलभुत गुणधर्म म्हणजे 'वर्गीकरण'.काहिसे चकित झाला असाल.तुम्ही 

कदाचित ज्ञान देणे,माहिती देणे,शिकवणे,सल्ला देणे आदि विचार केले असतील सुद्धा.परंतु 'वर्गीकरण' 

करणे हाच प्रत्येक गुरुचा मुलभूत गुणधर्म होय.किंबहूना हे जग ज्यांचे उच्छीष्ट आहे (व्यासोच्छिष्टं जगत सर्वम ।) अशा ज्या 

विशालबुद्धी महर्षी व्यासांप्रती आदर म्हणुन आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो त्या व्यास नावाचा अर्थच 

'वर्गीकरण करणारा' असा आहे. 

             म्हणून गुरु म्हणजे जटील ज्ञानाचं विच्छेदन करुन ते शिष्यांना सहज पचनी पडेल 

अशा स्वरुपात वर्गीकरण करुन त्याचा बोध करणारी व्यक्ति ! 

                 एखादा जपानी माणूस भारतात आला तर येथे त्याला एखाद्या दुभाषाची मदत 

घ्यावी लागेल.जोपर्यंत येथील भाषा कळत नाही,जोपर्यंत येथील व्यवहारांची त्याला पुर्ण कल्पना येत 

नाही तोपर्यंत तो दुभाषी म्हणजे त्याचा गुरुच होय.

                  अगदी व्यवहारात सुद्धा एखाद्याचा सल्ला घेतला तर तो सल्लागार व्यक्ति सुद्धा 

सल्ला घेणार्‍याचा गुरुच होतो.त्यामुळे अगदी सुक्ष्म विचार केला तर ही अवघी सृष्टी आपली गुरुच 

आहे असाच निश्चय होण्यास हरकत नाही.प्रत्येक घटकात काही ना काही घेण्यासारखे आहेच 

आहे.एवढी व्यापक भूमिका जर घेतली तर मनाचा संकुचितपणा नाहीसा होउन विश्वाप्रती प्रेम,आदर व 

जिव्हाळा उत्पन्न होयील..दत्तात्रेयांना सुद्धा चोवीस गुरु होते,जो जो ज्याचा गुण पाहीला तो तो त्यांनी 

गुरु केला.जर आपणहि त्यांची भक्ति करत असू तर आपणही त्यांच्यासम होण्याचा प्रयत्न करायला 

हवा.
                आता संतांच्या दृष्टीने गुरुचे स्थान काय आहे हे समजावुन घेउ.सर्व संतांच्या 

साहित्यात गुरुविषयी पुर्ण शरणागतभाव,अनन्यभावाचा अत्युच्च अविष्कार पाहायला मिळतो.संत 

ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 

             ।।आता हृदय हे आपुले।चौफाळूनिया भले।।
            ।।वरी बैसवू पाउले । श्रीगुरुंची।।

म्हणजे आता या हृदयाचा चौरंग करुन त्यावर श्रीगुरुंच्या पाउलांचे अधिष्ठान करु.अशीच सर्व संतांची 

मतेही गुरुविषयक पुज्यभावाची नित्य चढाओढ करताना दिसतात.त्यामुळे याबद्दल अधिक लिहिणे 

म्हणजे पुनरावृत्तिचा दोष स्वताहून ओढल्यासारखे होयील.थोडक्यात या सदगुरुरुपी मधाच्या पोळ्यातुन 

निथळणारे चार थेंब तरी मुखात पाडून घेणे हिच शिष्याच्या जीवनाची कृतकृत्यता आहे.
                 जो गुरुची सतत अवहेलना करेल,गुरुने सांगितलेल्या हिताची हेळसांड करेल 

थोडक्यात गुरुद्रोह करेल त्याला अधोगतीशिवाय दुसरी गती नाही.जो गुरुचा अनादर करेल त्याच्या 

आयुष्यात पतनाशिवाय दुसरे काही नाही.

                        ।।तयापरी जे श्रीगुरु।करीताती जे अंगीकारू।।
                        ।।तो होउनी ठाके संसारु । मोक्षमय अवघा।।

                  संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात गुरुंनी अंगीकार केल्यावर ते आपल्याला 

परिपूर्णतेकडे घेउन जातात.मात्र त्यांची कृपादृष्टी आपल्यावर पडेपर्यंत आपण त्यांची पुज्यभावाने सेवा 

करणे अपरिहार्य आहे.

                जो गुरुला अनन्यभावे शरण गेला त्याचे कल्याण झाले.वीर अर्जुन भगवान 

श्रीकृष्णाला शरण गेला तेव्हा त्याला 'करिष्ये वचनं तवः' म्हणण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं.प्रभू श्रीरामाला 

अनन्य शरण जाउन जगाला त्या भक्तीच्या वाटा दाखवण्याचा अधिकार कपिरुप हनुमंताला प्राप्त झाला,संत ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती नाथांना शरण गेले व गुह्य ज्ञान जगापुढे प्रगट करते झाले.जग जिंकण्याचं सामर्थ्य स्वामी विवेकानंदांना रामकृष्णांमुळे प्राप्त झाले, शिवराय तुकोबा,रामदासांना शरण गेले व भक्तिची उर्जा शक्तीत संक्रमित करुन स्वराज्य मिळवले.स्वतः प्रभू श्रीराम वसिष्ठ व भगवान श्रीकृष्ण सांदीपनी मुनींना शरण गेले.अशी किती उदाहरणे सांगु? खरं तर समुद्राची शाई व आकाशाचा कागद ही सुद्धा अतिशयोक्ती होणार नाही.
             तेव्हा 'सद्गुरुवाचूनी सापडेना सोय' हेच तात्पर्य थोड्याफार फरकाने सगळीकडे लागू आहे.

-संतचरणरज नितीन कळंबे 
                       

No comments:

Post a Comment