याति शुद्र वैश्य केला वेवसाव ।आधीँ तो हा देव कुळपूज्य ॥ १॥
नये बोलो परि पाळिले वचन । केलियाचा प्रश्न तुम्ही संतीँ ॥धृ ॥
संवसारे झालो अतिदु:खे दु:खी । मायबापे सेखी क्रमिलीया ॥३॥
दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली ॥४॥
लज्जा वाटे जीवा त्रासलो या दु:खेँ । वेवसाय देखे तुटी येतां ॥५॥
देवाचे देऊळ होते जे भंगलेँ ।चित्तासी ते आले करावेसे ॥६॥
आरंभी किर्तन करी एकादशी । नव्हते अभ्यासी चित्त आधी ॥७॥
काही पाठ केली संताची उत्तरे । विश्वास आदरे करोनिया ॥८॥
गाती पुढे त्याचे धरावे धृपद । भावे चित्त शुध्द करोनिया ॥९॥
संताचे सेविले तीर्थ पायवणी । लाज नाही मनी येऊ दिली ॥१०॥
ठाकला तो काही केला उपकार। केले हे शरीर कष्टवुनी ॥११॥
वचने मानिली नाही सुहृदांचि । समुळ प्रपंचीँ वीट आला ॥१२॥
सत्यअसत्यासी मन केले ग्वाही ।मानियेले नाही बहुमतां ॥१३॥
मानियेला स्वप्नीँ गुरुचा उपदेश ।धरिला विश्वास दृढ नामी ॥१४॥
यावरी या जाली कवित्वाची स्फूर्ती । पाय धरिले चित्तीँ विठोबाचे ॥१५॥
निषेधाचा कांही पडिला आघात । तेणेँ मध्ये चित्त दुखविले ॥१६॥
बुडविल्या वह्या बैसलो धरणे । केले नारायणे समाधान ॥१७॥
विस्तारी सांगतां बहुत प्रकार। होईल उशीर आतां पुरे ॥१८॥
आता आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणे ॥१९॥
भक्तां नारायणा नुपेक्षीँ सर्वथा । कृपावंत ऐसा कळोँ आलेँ ॥२०॥
तुका म्हणे माझे सर्व भांडवल । बोलविले बोल पांडुरंगेँ ॥२१॥
अभंग क्र.७६७(शिरवळकर )
No comments:
Post a Comment